Pandharpur Patwardhan Kuroli Bund Washed Away
पटवर्धन कुरोली, ता. पंढरपूर : उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यामुळे भीमा नदीला आलेल्या पुराचा फटका पटवर्धन कुरोली येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला बसला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचे भरावे वेगवान प्रवाहामुळे वाहून गेल्याचे निदर्शनास आले.
भरावे वाहून गेल्याने बंधाऱ्यावरील वाहतूक धोकादायक बनली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचारी जीव मुठीत धरून प्रवास करत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दैनंदिन वाहतुकीवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.
पुरामुळे झालेल्या नुकसानीची संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामा करावा आणि वाहून गेलेले भरावे युद्धपातळीवर पूर्ववत करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारची हानी टाळण्यासाठी बंधाऱ्याच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी आणि सक्षम उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.