सोलापूर : टंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरची मागणी करणाऱ्या प्रस्तावांना ४८ तासांच्या आत मंजुरी देण्याचे नियोजन असल्याने सर्व प्रांताधिकारी व तहसीलदारांनी अत्यंत कार्यक्षमतेने काम करावे, असे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.
संभाव्य टंचाई आराखडा नियोजनार्थ आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ऑनलाईन उपस्थित होते. सांगोला तालुक्यातील शिरभावी पाणीपुरवठा योजनेचे सुमारे एक कोटी ८५ लाख रुपये वीजबिल थकीत असल्याची माहिती पाणीपुरवठा योजनेचे अधीक्षक अभियंता पाटील यांनी दिली.
थकबाकीमुळे योजनेचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील सादलापूर व आंधेवाडी खुर्द तसेच माढा तालुक्यातील उपळाई येथील प्रलंबित अडचणी संबंधित तहसीलदारांनी दोन दिवसांत सोडवून ही कामे मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
उजनी धरण १०० टक्के भरलेले असले तरी जिल्ह्यातील अन्य ११ पैकी सात मध्यम प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात पथके तैनात करून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे. अनधिकृत वीज जोडण्यांवर कारवाई करावी आणि यासाठी महावितरणने आवश्यक सहकार्य करावे.- एस. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी