सोलापूर : जिल्ह्यातील तांदूळवाडी - वळसंग - बसवनगर - मंद्रुप- कुरूल- कामती आणि मोहोळ हा राष्ट्रीय महामार्ग नव्याने होत असून ते सध्या मंजुरीच्या टप्प्यात आहे. या रस्त्यासाठी 900 कोटींहून अधिक रक्कमेचे अंदाजपत्रक करण्यात आले आहे. नवीन मार्ग 107 किलोमीटर लांबीचा व 10 मीटर रुंदीचा होणार आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यास शहरातील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल. या नव्या मार्गाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाने केंद्राच्या रस्ते बांधणी विभागाकडे पाठवला आहे. यातील त्रुटीही दूर केल्या आहेत. या मार्गाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे, शहरातून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील अन्य ठिकाणी जाणारी वाहतूक या नवीन मार्गावरून होणार आहे.
शहरातून होणारी जड वाहतूक बंद करून बाह्यवळण मार्गाने वळवणे आवश्यक होते. पुणे व मुंबईहून कर्नाटकातील विजयपूरमार्गे अन्य ठिकाणी जाणाऱ्या जड वाहनांना पुणे व सोलापूर या महामार्गावरील केगावातील बाह्यवळण मार्गाने कर्नाटकात जातात. तसेच कर्नाटक व दक्षिण भारतात येणारी सर्व जड वाहतूकही याच मार्गाने पुणे व मुंबई आणि तसेच मध्यप्रदेशकडे जाते. या नव्या मार्गामुळे कर्नाटकातून हैदराबादकडे आणि हैदराबादहून कर्नाटकात व अन्य ठिकाणी जाणाऱ्या जड वाहनांसाठी हा मार्ग पर्याय मार्ग असेल. मुंबई, पुणे या मार्गावरून हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनांना सध्या शहरातील मार्गावरून जावे लागते.
वाहतुक कोंडी
कर्नाटकासह दक्षिण भारतातील विजयपूर मार्गे येऊन तेलंगणातील हैदराबादकडे जाणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांना सध्या शहरातून वाहतुकीच्या कोंडीतून जावे लागते. हा नवीन महामार्ग झाल्यास ती वाहने बसवनगर, औराद, बंकलगी मार्गे वळसंग, धोत्री, दिंडूर, मुस्ती आणि तांदूळवाडी या नवीन मार्गावरून हैदराबादकडे जातील.
नव्याने भूसंपादन करावे लागणार
तांदूळवाडी ते मोहोळ हा 107 कि.मी. चा रस्ता अस्तित्वात आहे. पण याची रुंदी 5 ते 7 मीटर आहे. ते वाढवण्यात येणार असून यासाठी नव्याने भूसंपादन करावे लागणार आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी नवीन पुलांची उभारणीही करण्यात येईल. केंद्रा सरकारकडून मंजुरी मिळाली की पुढील कामे होणार आहेत.