सोलापूर : सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने रेल्वेच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. येथून मुंबई व पुणेकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर, हुतात्मा आणि इंटरसिटी या तीनही एक्स्प्रेस गाड्या फुल्लच झाल्याचे दिसत आहे. शहर-जिल्ह्यातील प्रवाशांच्या या तीनही गाड्या हक्काच्या आहेत. पण, यांची प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे ऐनवेळी मुंबई आणि पुण्याला महत्त्वाच्या कामानिमित्त जावे लागणाऱ्यांची मोठी तारांबळ उडत आहे. दक्षिण व उत्तर भारतात जाणाऱ्यांचाही प्रवास सोपा राहिला नाहीच. याही एक्स्प्रेस गाड्यांच्या आरक्षणाची स्थिती सध्या हाऊसफुल्लच असून, अन्य गाड्यांच्याही प्रतीक्षा यादी ही लांबच लांब बनली आहे.
शहर-जिल्ह्यातील प्रवासी हे मुंबई व पुणेसह कर्नाटकातील बंगळुरू व अन्य ठिकाणी ये-जा करतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे सोलापूरकरांच्या हक्काच्या असलेल्या श्री सिद्धेश्वर, हुतात्मा आणि इंटरसिटी या तीनही गाड्यांचे आरक्षणाची प्रतीक्षा यादी लांबच लांब झाली आहे. ती वाढत असल्याने या तीनही गाड्यांचा प्रवास सध्यातरी सोपा राहिला नाही. शिवाय, बंगळुरू व हैदराबादला ये-जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक ठिकाणे असल्याने पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. यामुळे दक्षिण भारतातील या शहरांना जाणेही कठीणच बनले आहे.
कारण याठिकाणी जाणाऱ्या गाड्यांचीसुद्धा प्रत्यक्ष यादी मोठीच आहे. म्हणून, आरक्षण होणे शक्य नाही. तसेच उत्तर भारतात दिल्ली, वाराणसी, गोरखपूर, पाटणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची स्थितीही वेगळी नाही. यांचेही आरक्षण शक्य नाही. सोलापूरमार्गे धावणाऱ्या उत्तर भारतीय गाड्यांमध्येदेखील मे महिन्याच्या अखेरपर्यंत आरक्षण मिळणे अवघड आहे. त्यामुळे प्रवाशांनी गाड्यांची माहिती घेणे आवश्यक आहे.