अमोल साळुंके
सोलापूर ः जिल्ह्यातील 23 पेक्षा जास्त साखर कारखान्यांकडे ऊस बिलापोटी 276 कोटी एफआरपी थकली आहे. मात्र, कारखानदारांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागाला चुकीची माहिती देत एफआरपी कमी दाखवून कार्यालयाची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. दरम्यान, याविषयी ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य सुहास पाटील यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागाला निवेदन देत याविषयी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील 36 पैकी 23 साखर कारखान्यांकडे अंदाजे 276 कोटी 84 लाख रुपयांची एफआरपी थकली आहे. मात्र, साखर कारखानदारांनी प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडे चुकीची कागदपत्रे जमा करून मोठ्या प्रमाणात एफआरपी जमा केल्याचे दाखविले आहे. परंतु, शेतकऱ्यांना एफआरपी मिळाली नसल्याचे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सांगत आहेत. सन 2025-26 च्या ऊस गाळप हंगामाचे अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्यापही बिले दिली नाहीत. परंतु, कार्यालयीन रेकॉर्डनुसार थकीत एफआरपी कमी दाखवत असून, बहुतांश कारखान्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची बिले शेतकऱ्यांना दिल्याचे दाखविले आहे.
साखर हंगाम सुरू होत असताना सर्व साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी अनेक कारखान्यांनी केली नाही. त्यामुळे अशा साखर कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी.सुहास पाटील, सदस्य, ऊस दर नियंत्रण मंडळ