सोलापूर : पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसारजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी ग्रामपंचायतीने पाण्याच्या टाक्या स्वच्छ अन् निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सीईओ जैन यांनी ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत. अतिसार हा विशेषतः पाच वर्षांखालील बालकांसाठी जीवघेणा ठरू शकणारा आजार आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छताविषयक नियमांचे पालन केल्यास या आजारावर नियंत्रण मिळविता येते. त्यामुळे जनजागृतीसाठी हे अभियान राबविण्याचे आवाहन सीईओ जैन यांनी केले आहे.
आरोग्य विभाग, ग्रामपंचायती, स्वच्छता मिशन कक्ष, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयातून हे अभियान राबविण्यात येणार आहे.
ग्रामस्तरावर होणार बैठका
अभियानांतर्गत तालुका व ग्रामस्तरावर बैठका घेऊन ग्रामपंचायती, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये व्यापक जनजागृती केली जाणार आहे.
पाण्याची होणार तपासणी
गावनिहाय पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी, सर्व जलस्रोतांची नियमित चाचणी तसेच विद्यार्थी आणि स्वयंसेवकांना फिल्ड टेस्ट किटद्वारे पाणी तपासणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जनजागृतीवर विशेष राहणार भर
हात धुण्याचे महत्त्व, सुरक्षित पाणी वापर, अन्न स्वच्छतेचे नियम आणि अतिसार प्रतिबंधाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.