सोलापूर : रिक्षाचालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने (दि. 16) गुरुवारी शहरात महामोर्चा काढण्यात आला. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आगामी काळात सोलापूर बंद करू, असा निर्वाणीचा इशारा माजी आ. नरसय्या आडम मास्तर यांनी यावेळी दिला.
गुरूवारी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून या मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये सुमारे 1000 ते 1500 रिक्षाचालक सहभागी झाले होते. पूनम गेट येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी सरकारच्या कल्याणकारी मंडळावर टीका केली. हे मंडळ फसवे असून चालकांच्या हितासाठी सभासद शुल्क केवळ 1 रुपया ठेवावे, अशी मागणी त्यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा सेलचे अध्यक्ष महिपती पवार यांनीही चालकांना एकजुटीचे आवाहन केले. आंदोलनात रियाज सय्यद, युसुफ मेजर, आतिश शिंदे, राजू सिंगने यांच्यासह हजारो रिक्षाचालक उपस्थित होते. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पवित्रा कृती समितीने घेतला आहे.