Bhima River Electricity Supply Restoration
पटवर्धन कुरोली : भिमा नदीकाठच्या गावांमध्ये शेतीसाठी दिला जाणारा आठ तासांचा वीजपुरवठा गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सततचे लोडशेडिंग, वारंवार ट्रिपिंग आणि अनियमित वीजपुरवठ्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने खरीप हंगामातील शेती धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल अरुण कौलगे पाटील यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राहुल कौलगे पाटील यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समितीच्या उद्याच्या बैठकीत ते थेट उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत. भिमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना नियमानुसार मिळणारा आठ तासांचा वीजपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकाऱ्यांना चंद्रभागेच्या पाण्याने आंघोळ घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
भिमा नदीकाठच्या गावांसाठी शेतीपंपांना नियोजित आठ तास वीजपुरवठ्याचे धोरण असले, तरी प्रत्यक्षात अनेक भागांत वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अचानक वीज खंडित झाल्याने पंप बंद पडतात, सिंचनाचे नियोजन विस्कळीत होते आणि पिकांचे मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खरीप हंगामाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर ही परिस्थिती अधिक गंभीर ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
प्रशासनावर टीका करताना राहुल कौलगे पाटील म्हणाले, "शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. कार्यालयातील अहवालांपेक्षा प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थिती पाहण्याची गरज आहे. आमच्या आंदोलनाचा उद्देश गोंधळ घालणे नसून प्रशासनाला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव करून देणे हा आहे."
त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हा प्रशासन आणि महावितरण विभागात हालचालींना वेग आल्याची चर्चा असून, उद्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या प्रश्नावर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे भिमा नदीकाठच्या हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राहुल कौलगे पाटील यांनी स्पष्ट केले की, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत लेखी आश्वासन मागितले जाणार आहे. प्रशासनाकडून समाधानकारक निर्णय न झाल्यास चंद्रभागेच्या पाण्याने प्रतीकात्मक आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही प्रश्न न सुटल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.