सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर आणि पांडुरंग जगाच्या नकाशावर येण्यासाठी आणि त्या ठिकाणी व्यापार उद्योगाला चालना मिळण्यासाठी पंढरपूर येथे नव्याने विमानतळ करण्याचा प्रस्ताव तातडीने राज्यशासनाला पाठवून द्या अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलमताई गोर्हे यांनी सोलापुरात केल्या आहेत.
उपसभापती गोर्हे या मंगळवारी (दि. २०) सोलापूर दौर्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली तसेच पंढरपूर तीर्थ क्षेत्र विकास आराखडा आणि पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाचा ही आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सोलापूरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हा प्रमुख अस्मिता गायकवाड, स्मिता पाटील, सुनिता मोरे, संजना घाडी, पुजा खंदारे आदी उपस्थित होत्या. पंढरपूर तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यासाठी शासनाकडून जवळपास 73 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.त्या कामाच्या निविदा ही निघाल्या आहेत.त्यामुळे पंढरपूरचा विकास करताना प्रति पंढरपूर उभा करण्याच्या दृष्टीने आणि त्या ठिकाणी असलेल्या व्यापारी उद्योजक आणि वारकर्यांना सहभागी करुन घ्याव्या अशा सूचना ही देण्यात आल्या असल्याची माहिती गोर्हे यांनी दिली आहे.तसेच विकास कामांत स्थानिकांनी सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले.पंढरपूर तीर्थ क्षेत्र आणि पांडुरंगाची महती जगभर आहेच मात्र त्याला आणखी चालना देण्यासाठी तसेच उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी पंढरपूर येथे शिर्डीच्या धरतीवर स्वतंत्र विमानतळ करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकार्यांनी राज्यशासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवून द्यावा अशा सूचना यावेळी करण्यात आलेल्या आहेत.तसेच राज्यशासनाकडून तातडीने हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल अशी माहिती ही गोर्हे यांनी दिली आहे.
पंढरपूरात अचानक गर्दी होते त्यामुळे स्वच्छतेची यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडते त्यासाठी स्वच्छता गृहांची संख्या वाढविण्याची गरज आहे. तसेच पुणे, पिपंरी चिंचवड या महापालिकांमधून बाहेर पडणारे सांडपाणी थेट नदीपात्रात उजनी धरणात येत असल्याने धरणाचे पाणी दुषित होत आहे.त्यामुळे त्या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभा करण्याची गरज असल्याचे मत उपसभापती निलम गोर्हे यांनी व्यक्त केले आहे.
वारीत अन्नपदार्थात मोठ्या प्रमाणात भेसळ करुन विक्री करण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे. तसेच पंढरपूरात महिला वर्गाकडून कुंकवाची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते.मात्र केमिकलच्या भेसळीमुळे अलर्जी होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रशासनाने भेसळीकडे लक्ष देण्याच्या सूचना ही यावेळी उपसभापती निलम गोर्हे यांनी दिल्या आहेत.