माळशिरस : माळशिरस पोलिसांनी विविध गुन्ह्यांत जप्त केलेल्या चाळीस दुचाकी गाड्या मूळ मालकांना परत देण्यात आल्याची माहिती माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास दिंडुरे यांनी दिली.
माळशिरस पोलिस ठाण्यात गेले अनेक वर्षापासून विविध गुन्ह्यांत जप्त केलेल्या, हरवलेल्या दुचाकी गाड्या ठेवण्यात आल्या होत्या. सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या निर्देशानुसार अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनानुसार सदर गाड्या त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
या सूचने अंतर्गत माळशिरस पोलिस ठाण्याच्या वतीने या दुचाकी मूळ मालकांना त्याच्या दुचाकी कागदपत्राची पडताळणी करून परत करण्यात आल्या आहेत. ज्या गाड्यांचे नंबर बदलण्यात आले होते. त्याचा इंजिन व चेसी नंबरवरून आर. टी. ओ. अधिकाऱ्यांशी संपर्क करून मालकांची नावे शोधली. तपासणी नंतर पोलिस निरीक्षक विकास दिंडुरे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप गोसावी, सहायक फौजदार राजेंद्र सरवदे यांच्या उपस्थितीत या गाड्या मूळ मालकांना परत देण्यात आल्या आहेत.