सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी बुधवारी धर्मवीर संभाजी महाराज तलावात पोलिसांना चकवा देत उड्या मारुन जलसमाधी आंदोलन केले.
यावेळी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे यांनी आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालया समोरील ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या सतरा दिवसांपासून धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत.
दोन दिवसांत मार्ग काढू : जिल्हाधिकारी
आंदोलक शेतकऱ्यांची बैठक घेऊन थकीत बिलाचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे ठेवून दोन दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिल्याचे आंदोलनाचे नेते ॲड. अमोल पाटील सांगितले.
ऊस बिलाचे दोन लाख 10 हजार रुपये थकले आहेत. ते मिळावे, यासाठी गेल्या सतरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहे. बिल मिळत नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत असून, गावाकडे जाऊन काय करायचं. त्यापेक्षा तलावात उडी मारण्यासाठी येथे आले.- प्रमिला इंगळे, महिला शेतकरी, शहापूर, ता. तुळजापूर