पटवर्धन कुरोली: समाज कल्याण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये पिराची कुरोली येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा सनम अर्जुन लामकाने याची महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने निवड झाली. ही निवड झाल्याबद्दल गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण मातीतील आई- बाबांच्या संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न त्याने बघितले. त्यासाठी त्याने विद्येचे माहेरघर समजला जाणारा पुणे जिल्हा गाठला. तेथील शैक्षणिक वातावरणाच्या प्रभावामुळे त्याने जिद्दीने अभ्यास केला. यामुळेच त्याच्या मेहनतीला फळ आले. नुकत्याच समाजकल्याण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये त्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने येण्याचा बहुमान मिळवला.
सनम यांचे प्राथमिक शिक्षण वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली तसेच महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर पॉलिटिकल सायन्स या विषयातून ग्रॅज्युएशन झाले. त्याने उच्च महाविद्यालयीन शिक्षण सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मास्टर ऑफ पॉलिटिकल सायन्स या विषयातून केले. त्याचबरोबर सेट परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची या स्पर्धा परिक्षेची तयारी पाच ते सहा वर्ष चालू होती. त्या कष्टाला आज हे यश मिळाल्यामुळे तो समाधानी आहे.
या यशामध्ये त्याचा लहान भाऊ निलेश याचा मोलाचा वाटा आहे. वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं. मामा दत्ता आटकले, भाऊ सूरज आटकळे यांची साथ लाभली. अनेक मित्रांनी साथ दिली. त्यांचा आभारी आहे. अशा भावना सनमने व्यक्त केल्या आहेत. त्याला सुरज नाईकवाडी ,विकास देशमुख, दीनानाथ देशमुख ,वैभव भुसे, ओंकार मिरगिने, विकास वल्ले, विकास फतांगरे या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.