पिलीव : माळशिरस तालुक्यातील नीरा देवधर प्रकल्पातून वंचित गावांना नीरा देवधरचे पाणी मिळावे, यासाठी या भागातील नागरिकांच्या ११ हजार सह्यांचे निवेदन देण्यात आले होते. याच अनुषंगाने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसंपदा मंञी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंञालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या योजनेत समाविष्ट असणाऱ्या १२ गावांचे दोन महिन्यात टेंडर काढण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या विशेष सहकार्यातून या भागाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागावा म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यासाठी गेली अकरा वर्षे अखंडितपणे संघर्ष करणारे शिवराज पुकळे यांना बैठकीचे विशेष निमंत्रित देण्यात आले होते. या बैठकीमध्ये मुळ समाविष्ट असणाऱ्या बारा गावांचे दोन महिन्यात टेंडर काढण्यात येणार आहे.
यामध्ये कारुंडे, पिंपरी, लोणंद, रेडे, गिरवी, मांडवे, मांडकी, कण्हेर, इस्लामपूर, भांबुर्डी, गोरडवाडी, मोटेवाडी या गावाचे तर नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १६ गावांचा टेंडर काढण्यासाठी दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे ठरले आहे.
यामध्ये सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी, पिलीव, कोळेगाव, जळभावी, गारवाड, मगरवाडी, कोथळे, भांब, फडतरी, लोंढे मोहितेवाडी, पठाणवस्ती, तरंगफळ, काळमवाडी, चांदापुरी या गावांचा टेंडर अहवाल दोन महिन्यात सादर करण्याचे ठरले. यामध्ये माळशिरस तालुक्यातील कायमस्वरुपी दुष्काळी पट्ट्यातील २८ गावांना पाणी मिळणार आहे.