मोहोळ : निसर्गाच्या लहरीपणाचे चित्र यंदाच्या मान्सूनमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. गेल्या वर्षी २१ जून २०२५ रोजी सीना, भोगावती नद्यांसह जिल्ह्यातील सर्वच नद्यांना आलेल्या महापुरामुळे त्या दुथडी भरून वाहत होत्या. मात्र यंदा २१ जून २०२६ रोजी याच सीना, भोगावती नद्यांचे पात्र पूर्णपणे कोरडेठाक पडले असून, चिमणीला प्यायलाही पाणी नाही, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी मशागत, खतांची तयारी आणि बी-बियाणांची जुळवाजुळव करून ठेवली असली तरी पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. ज्याठिकाणी पेरण्या झाल्या आहेत, तेथील उगवलेली पिकेही ओलाव्याअभावी करपू लागली आहेत.
पाण्याअभावी विहिरी, ओढे आणि लहान जलस्रोत आटत चालले असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे. गेल्यावर्षी याच काळात पुराच्या संकटाचा सामना करणाऱ्या नागरिकांना यंदा दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.