माढा : लोकांचे संसार डोळ्यात देखत वाहून गेले, जखमा अजून ओल्या आहेत. पाणी सोडण्याचे नियोजन व्यवस्थित झाले नसल्याने महापुराची परिस्थिती भोगलेल्या सीना काठच्या शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे, अशा तीव्र शब्दांत व्यथा व्यक्त करत धाराशिव जिल्ह्यातील कोळेगाव धरणातून सीना नदीत तत्काळ पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी भव्य शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढला.
माढा येथे निघालेल्या या मोर्चात सीना नदीकाठच्या गावांतील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मुन्ना साठे यांनी इशारा दिला की, हापुरामुळे नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या, अनेकांचे संसार रस्त्यावर आले. आत्ता नदी कोरडी पडली आहे. कोळगाव धरणातून तत्काळ पाणी सोडावे, अन्यथा यापुढे या धरणातून सीना नदीत पाणी सोडण्यालाच आम्ही विरोध करू.
संजय पाटील घाटणेकर म्हणाले, उजनी धरणातून सोडलेल्या पाण्याचे नियोजन चुकल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले. महापुराने आधी उध्वस्त केले, आता पाण्याअभावी रब्बी हंगाम धोक्यात आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोळगाव धरणातून पाणी सोडलेच पाहिजे.
यापुढील काळातही संघर्ष करावा लागणार असून गावोगावी समित्या स्थापन करून एकत्रित लढा उभा करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.