महूद : महूद येथील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे महूद ग्रामस्थ कमालीचे त्रासले असून या वाहतूक कोंडीवर प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाने महूद च्या मुख्य चौकातील वाहतुकीस अडथळा करणारी अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा केला आहे. मात्र ही अतिक्रमणे काढताना पोलीस प्रशासनाने भेदभाव केल्याची चर्चा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.
जत ते इंदापूर हा राष्ट्रीय महामार्ग तर पंढरपूर ते मल्हारपेठ हा राज्य महामार्ग असे दोन महामार्ग कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आले आहेत. या दोन महामार्गावर चौकाच्या ठिकाणी असणाऱ्या सांगोला तालुक्यातील महूद येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहने तासनतास अडकून पडत आहेत. मुळात या महामार्गांचे काम करताना नियमाप्रमाणे रस्त्याचे रुंदीकरणच झालेले नाही. नियमापेक्षा कमी रुंदीचे महामार्ग बनविण्यात आले आहेत.
या महामार्गावरुन फार मोठी अवजड वाहतूक सुरू आहेत. त्यातच महूद हे वीस हजारहून अधिक लोकसंख्येचे गाव असून परिसरातील अनेक गावे आणि वाड्या-वस्त्यांचे मुख्य बाजारपेठेचे ठिकाण आहे. येथील मुख्य चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे झालेल्या अपघातात आजपर्यंत असंख्य नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. या मार्गावरून शेकडो शालेय विद्यार्थी ये-जा करत असतात. या विद्यार्थ्यांना, महिला व वयोवृद्ध नागरिकांना मुख्य चौकातून जाताना आपला जीव अक्षरशः मुठीत घेऊन जावे लागते. या वाहतूक कोंडीवर तात्काळ योग्य मार्ग काढावा अशी मागणी येथील दिलीप केसकर, सागर साबळे, नवा सरतापे, नागेश थोरात आदी युवकांनी जिल्हाधिकारी, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.
वाहतुकीस अडथळा करणारे अतिक्रमण काढत असताना पोलीस प्रशासनाने भेदभाव केल्याची चर्चा ग्रामस्थांमधून केली जात आहे. काही भागात वाहतुकीस कोणताही अडथळा होत नसतानाही गोरगरिबांची दुकाने उध्वस्त करण्यात आली आहेत.
मात्र याचवेळी रस्त्याच्या कडेला थेट गटारावर अनेक धनदांडग्यांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. वाहतुकीचा मोठा अडथळा होत असताना सुद्धा ही अतिक्रमणे पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक काढली नसल्याचे बोलले जात आहे.