सोलापूर : शेतकऱ्यांसाठी सौर कृषी ऊर्जेच्या माध्यमातून बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना दिवस वीज पुरवठा केला जात असल्याने रात्रीच्या वेळी घडणाऱ्या अपघातातून मुक्तता मिळाली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून. या योजनेमुळे बारामती परिमंडळातील १ लक्ष ४३ हजार शेतकऱ्यांना दिवसा विजेचा लाभ होत आहे. तर सौरपंपामुळे ५८ हजार ६८४ शेतकऱ्यांना हक्काची, शाश्वत, दिवसा व मोफत वीज उपलब्ध झाली आहे.
कृषी भार अधिक असलेल्या वीज उपकेंद्रांच्या परिसरात विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येत आहे. या कृषी ग्राहकांना यापूर्वी आवर्तन पद्धतीने दिवसा किंवा रात्री वीजपुरवठा केला जात होते. रात्रीच्या वेळी शेतीपंप चालविण्यामुळे शेतकऱ्यांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन, दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले जात आहेत.
सातारा मंडळात ८६१ एकर जमिनीवर १७५ मेगावॅट क्षमतेचे ४२ प्रकल्प उभारण्यात आले असून त्यामुळे ५७ हजार ४३८ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. बारामती ग्रामीण मंडळात ४४० एकर जमिनीवर १११ मेगावॅट क्षमतेचे २२ प्रकल्प उभारण्यात आले असून त्यामुळे ३५ हजार ५४१ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.
दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन अधिक सोयीस्करपणे करता येत असून, रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी देण्याची गरज कमी होत असल्याने शेतकऱ्यांची सुरक्षितता, वेळ आणि श्रम यांचीही बचत होत आहे.सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होते.