रवी शिरढोणे
अकलूज : श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर दि.२० रोजी होत आहे. या गोल रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.
शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील व स.मा.वि.चे सभापती सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी रिंगण सोहळ्याचे शिस्तबद्ध नियोजन केले आहे. मैदानावर ४३ मीटर व्यासाचा गोल तयार करून त्याला लाकडाचे बॅरीकेड बांधण्यात आले आहेत व मैदानाच्या मधोमध पालखीच्या विसाव्या करता मंडप उभारण्यात आला आहे.
रिंगण सोहळ्यानंतर पालखी याच ठिकाणी मुक्कामी असल्याकारणाने येथे दर्शन रांगही तयार केली आहे.याकरिता संस्थेचे स्वयंसेवकही तैनात आहेत. याशिवाय सीसीटीव्ही, आपत्कालीन कक्ष, महिलांसाठी हिरकणी कक्ष, वैष्णवांच्या निवासाकरिता खोल्या व तंबूंची उभारणी होणार आहे. मैदानावर चिखल होऊ नये, याकरिता मुरमीकरण करण्यात आले असून लाखो वैष्णवांना हा सोहळा पाहता यावा याकरिता सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.