सोलापूर : जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून हर घर जल पोहोचविले जात असून, कामात हयगय करणार्या ठेकेदारांना 76 लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून, त्यातील 41 लाख रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कायर्र्कारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
जिल्ह्यात जलजीवन मिशनची सुमारे 2 हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी जमिनीत पाईप टाकताना अपेक्षित खोलीकरण केले नसल्याचे समोर आले आहे. जागा उपलब्ध करून देऊनही कामे पूर्ण करण्यास विलंब केल्याच्या कारणावरून दंड आकारण्यात आला आहे. चालू असलेल्या कामांची मुदत डिसेंबर 2026 पर्यंत आहे. जीएसटीत झालेल्या बदलांमुळे 206 कामांचे सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आले असून, त्यासाठी 100 कोटी रुपये निधी लागणार आहे. तशी मागणी करण्यात आल्याचेही जंगम यांनी सांगितले.
70 कोटींची मागणी
जलजीवन मिशन योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची बिले मिळावी, यासाठी 70 कोटी रुपयांचा निधी शासनाकडे मागितला आहे. एकूण 1329 कामे असून, यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत 1009 कामे असून, उर्वरित 320 कामे नळजोडणीचे आहेत. नळजोडणी प्रकरणातील 200 कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे ही पूर्ण होण्यासाठी महिनानिहाय उद्दिष्ट ठरवून देण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितली.