सोलापूर : शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक परिसरात सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने मंगळवारी मोठी कारवाई करत एन.जी. मिल कंपाऊंडमधील न्यू गांधी कॉलनीतील अतिक्रमित बांधकाम जमीनदोस्त केले. कारवाईदरम्यान अतिक्रमणधारक व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. विरोध झुगारून अखेर ही कारवाई पूर्ण केली.
डॉ. कोटणीस यांचे स्मारक उभारणीपूर्वी या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या 34 कुटुंबांचे शासनाकडून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातील न्यू गांधी कॉलनी एनजी मिल कंपाऊंड येथे पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र, याच शासनाच्या जागेवर एका व्यक्तीने पुन्हा अतिक्रमण करून मजबूत घर आणि पत्रा शेड उभारले होते. या प्रकरणी भूमी व मालमत्ता विभागाने अतिक्रमण प्रतिबंधक विभागाला कारवाईचे पत्र दिल्यानंतर आज अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्तात ही पाडकाम मोहीम राबविण्यात आली.
कारवाई सुरू असताना संबंधित अतिक्रमणधारकाने बनसोडे यांचा हात पकडत विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावर बनसोडे यांनी संताप व्यक्त करत हात धरायचा काय अधिकार? असा सवाल करत त्यास दूर केले. यावेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबातील महिलांनी आक्रोश करत कारवाईला विरोध दर्शविला. दरम्यान परिसरातील इतर महिलांनी मात्र या अतिक्रमणामुळे त्रास होत असल्याचे सांगत ते तत्काळ हटवण्याची मागणी केली. अखेरीस महापालिकेच्या पथकाने संबंधित अतिक्रमण पूर्णतः पाडून टाकत जागा मोकळी केली.