सोलापूर : शहरातील १६ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा कडक सुरक्षेत व शांततेत पार पडली. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर सीआयएसएफ व पोलिसांचा बंदोबस्त होता. सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यात आली होती. परीक्षेसाठी एकूण ५ हजार ९४७ विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ४१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ५२८ विद्यार्थी गैरहजर राहिले. परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत पार पडली. दिव्यांग विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ देण्यात आला होता.
सर्वच परीक्षा केंद्रांवर प्रवेशापूर्वी उमेदवारांची बायोमेट्रिक पडताळणी करण्यात आली. दुपारी १.३० नंतर कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर ड्युटी मॅजिस्ट्रेट नियुक्त करण्यात आले होते. भरारी पथके, समन्वयक व केंद्रप्रमुख यांच्याकडून सातत्याने देखरेख ठेवण्यात आली. पोलिस अधिकारी परीक्षा केंद्रावर ठाण मांडून बसले होते.
बायोलॉजी सोपा तर फिजिक्सचे प्रश्न अवघड असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. परीक्षा केंद्रावर विद्यार्थांची कसून तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात जाताना आधार कार्ड व रिसीट इतकेच घेऊन जाण्याची अनुमती देण्यात आली होती. तपासणीसाठी प्रत्येक विद्यार्थीसाठी साधारण ५ ते ७ मिनिटे लागल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तपासणीवेळी रुमाल देखील काढून ठेवण्यास सांगितले. विद्यार्थिनींच्या दागिन्यांना मज्जाव होता.
बायोमॅट्रिक उपस्थितीनंतर बोटाची शाई पुसण्यासाठी टिश्यू पेपर देण्यात आला होता. बायोलॉजी सोपा तर फिजिक्सचे काही प्रश्न अवघड होते. परीक्षेसाठी मेहनत घेतली असून आता निकालाची प्रतीक्षा आहे- ऋतुजा वाघमोडे (विद्यार्थींनी)
सध्या तापमानात वाढ झाली आहे. परीक्षा म्हटले की, विद्यार्थांना घाम येतो. यामुळे रूमालाची तपासणी करून ते घेऊन जाण्याची परवानगी देणे आवश्यक वाटले. तसेच पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली असती तर उत्तम झाले असते.- बाबूराव जाधव (पालक)