बार्शी : कारने मागून दिलेल्या धडकेत एका बागायदार शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तालुक्यातील नारी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. काकासाहेब भारत कदम (वय ५०, रा. नारी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
काकासाहेब कदम हे आपल्या शेतातून काम आटोपून गावाकडे रस्त्याच्या कडेने चालत जात होते. त्याचवेळी बार्शी-धाराशिव रोडवरील नारी गावाजवळ कारने (एमएच १४ केएफ २७४८) त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कदम गंभीर जखमी होऊन रस्त्यावर फेकले गेले. नागरिकांनी जखमी अवस्थेत कदम यांना तातडीने बार्शी येथील खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचार मिळण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
काकासाहेब कदम हे प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच नारी गावावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. अपघातग्रस्त कार पोलिसांनी ताब्यात घेतली. अद्याप याप्रकरणी गुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.