सोलापूर : सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठीची महत्त्वकांक्षी अशी प्रस्तावित १ हजार ४८३ कोटी रुपयांच्या जलवितरण योजनेतील एक रुपयाही कमी होणार नाही. योजनेची रक्कम कमी करण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अगरवाल यांनी दिल्या असल्या तरी पूर्वअभ्यास करूनच हा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. सोलापूरला या योजनेची नितांत गरज असून प्रकल्प पूर्णतेसाठी प्राधान्याने प्रयत्न सुरू असल्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले.
मुंबईत मुख्य सचिवांसमोर या जलवितरण आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होते. प्रस्तावित खर्च, तांत्रिक बाबी आणि विविध कामांच्या नियोजनाबाबत मुख्य सचिवांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच ८८३ कोटींच्या मूळ प्रकल्पाची किंमत १ हजार ४८३ कोटी रुपयांपर्यंत कशी वाढली?, याचीही माहिती मागविण्यात आली. खर्चात कपात करून फेरआराखडा सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे योजनेला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही.
मुख्य सचिवांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारचा डीएसआर (दर विश्लेषण) तपासण्याबरोबरच दक्षिण आणि उत्तर भारतातील प्रत्येकी दोन अशा चार शहरांच्या पाणीपुरवठा योजनांचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्यासह संबंधित अधिकारी अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. या अभ्यासादरम्यान संबंधित शहरांतील पाणीपुरवठा योजनेची कार्यपद्धती, पाइपलाइन, अंमलबजावणी आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर सुधारित आराखडा शासनाला सादर केला जाईल.