सोलापूर : सरकारी कागदपत्रानुसार १ जून ते ३० सप्टेंबर असा पावसाळ्याचा कालावधी असून, यंदाच्या पावसाळ्यातील ९० दिवस संपले असून, आता ३० दिवसच राहिले आहेत. या उर्वरित ३० दिवसात तीन नक्षत्रातील पाऊस अपेक्षित आहे. रब्बीचा परतीचा पाऊस न झाल्यास पुढील हिवाळा, उन्हाळा कडक जाण्याबरोबरच दुष्काळाची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तविता जात आहे.
जून, जुलै, ऑगस्ट या तीन्ही महिन्याची सरासरी पाऊस हे १०२ मिमी इतका असून यंदा तो ५६ मिमी इतकाच सरासरी पाऊस पडला आहे. यंदा ५५ टक्यापेक्षा अधिक पावसाची तुट राहिली आहे. त्यामुळे खरिप पिकेही संकटात सापडली असून, तापमान पुन्हा ३६ अंशाकडे वाटचाल करत आहे.
नुलूपुनमला वाऱ्याचा वेगही कायम
नुलूपूनम म्हणजे नारळी पौर्णिमेला वाऱ्यामुळे सुताचा दोराही हलत नाही, अशी धारणा आहे. आषाढ महिन्यापासून सुरु झालेला वारा या पौर्णिमेला थांबून शांत होते. त्यानंतर पावसाला सुरुवात होते. परंतू यंदाच्या वर्षी अल निनो परिणामामुळे शुक्रवारी पौर्णिमेच्या दिवशी तासी ३० किलोमीटरपेक्षा अधिक जोरदार वारे वाहिल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदा परतीचा म्हणजे रब्बी हंगामातील पाऊसही दगा देण्याची भिती व्यक्त होत आहे. मात्र यंदा असे झाले तर शेतीसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उदभवू शकतो.
बेडुक, उंदीर, गाढवाकडे लक्ष्य
सध्या मघा नक्षत्रातील पाऊस सुरु असून वाहन मोर आहे. यंदा मोर नाचलाच नाही. तर ३० ऑगस्टपासून पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातील पावसात सुरुवात होणार वाहन गाढव आहे. तर १३ सप्टेंबरपासून उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातील पावसाला सुरुवात होणार असून, वाहन बेडुक आहे. यंदा पावसाळ्यातील शेवटचा हस्त नक्षत्रातील पावसास २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पेरणी झालेले खरिप आणि रब्बीत होणारे पेरणीचे भवितव्य ही या तीन्ही नक्षत्रातील पावसावर अवलंबून आहे.
सोलापूर हा रब्बीचा जिल्हा
सोलापूर जिल्हा हा रब्बी जिल्हा असून, गेल्या १५ वर्षात पाऊसमान चांगला राहिल्याने आणि सिंचनाची सुविधा झाल्याने खरिपातही पेरणी क्षेत्र वाढले. १३ सप्टेंबरपासून रब्बीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. परतीचा म्हणजे रब्बीचा पाऊस कसा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष्य लागून आहे.