पोखरापूर : स्वच्छतेबाबत मोहोळ नगरपरिषदेकडून असलेल्या उदासिनतेमूळे शहरात कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या गटारी त्यातुन घाणीचे साम्राज्य वाढले आहे. डासांच्या त्रासामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले असून शहरातील सर्व नागरी वस्ती परिसरात फवारणी करून पावडर टाकण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
मोहोळ शहराची वाढती लोकसंख्या पाहता प्रत्येक प्रभागात तुंबलेल्या फुटलेल्या गटारी व त्यातुन वाहणारे घाण पाणी साठलेल्या अवस्थेत घाणीचे साम्राज्य वाढले आहेत. परिणामी डासांचे प्रमाण वाढले असुन थंडी, ताप, खोकला या लक्षणांमुळे डेंगु सदृष्य रोगाच्या साथीचेेे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांची दवाखान्यात गर्दी होत आहे. दुसरीकडे नगरपरिषद प्रशासन नागरिकांना डेंग्यु किंवा अन्य रोगाची लागण होण्याची जणु वाटच पाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. स्वच्छता कर भरून आर्थिक ओझ्याने कंबरडे मोडलेल्या मोहोळकरांचे आरोग्य धोक्यात आले असुन प्रत्येक प्रभागात तुंबलेल्या गटारी व त्यातुन वाहणारे घाण पाणी साठलेल्या अवस्थेत सगळीकडे पसरत आहे.
याबाबत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने शहरात तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून पावसाळ्यामुळे उगवलेली झाडे झुडपे, ठिकठिकाणी साचलेल्या गटारी रिकाम्या करणे, पडलेले कचऱ्याचे ढिगारे उचलणे, सार्वजनिक ठिकाणी तसेच नागरी वस्ती परिसरात फॉगिंग पंपाद्वारे फवारणी करून जंतुनाशक पावडर टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. नगरपरिषद आरोग्य प्रशासनाने प्रभाग निहाय स्वच्छता मोहीम सुरू करण्याची मागणी होत आहे.