सोलापूर : भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर गेलेले आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मुदत संपत आहे. आता त्यांच्या जागेवर भाजप कुणाला संधी देणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले असून, पुन्हा मोहिते- पाटील की नवे चेहऱ्याला पुढे करून भाजप धक्कातंत्र वापरणार, याकडे राजकीय जाणकरांचे लक्ष लागून आहे. निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या 13 मे रोजी मुदत संपणाऱ्या एकूण 9 जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात सोलापूरच्या एका जागेचा समावेश आहे.
नुकत्याच संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यात मागील सहा वर्षांपासून आमदारकीच्या प्रतीक्षेत असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आ. राम सातपुते, माजी आ. दिलीप माने, माजी आ. राजेंद्र राऊत, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राजन पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
मोहिते-पाटील यांना शह देण्यासाठी राम सातपुते यांना संधी देणार असल्याची चर्चा आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर त्यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांची समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे. भाजपचे कुटुंबाच्या राजकारणाला विरोधाचे धोरण आहे. तर सन 2028 मध्ये होणारी विधानसभा, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोहिते-पाटील यांच्याबाबत भाजप कोणता निर्णय घेणार यावर राजकीय गणित अवलंबून असणार आहे.
माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे नाव चर्चेत आहे. परंतु त्यांचे बंधू इंद्रजित पवार यांची जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. माजी आ. राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सर्वच सर्व जागा जिंकल्या आहेत. सलग पाचव्यांदा पंचायत समितीवर सत्ता राखली आहे. त्यामुळे राऊत यांनाही विधान परिषदेच्या आमदारकीची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा आहे.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या जागेवर भाजपने आणखी एक उमेदवारी सोलापूरला दिल्यास एक आमदार वाढेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने एक आमदार वाढण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 68 पैकी तब्बल 38 जागा जिंकून प्रथमच निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
अकरा पंचायत समित्यांपैकी तब्बल सात समित्यात भाजपने यश मिळविले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने 102 जागांपैकी 87 जागा मिळविल्या आहेत. नगरपरिषदांच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक निवडून आलेली आहे. ती 130 पेक्षा जास्त आहे. त्या अगोदर झालेल्या नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीतही भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यामुळे भाजपची स्थानिक स्वराज्य संंस्थांमधील सदस्यांची संख्या 300 पेक्षा जास्त जाते. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पारडे नक्कीच जड असणार आहे.