सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीत सहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी मंगळवारी (दि. 5) औज बंधाऱ्यात पोहोचले आहे. मात्र, हे पाणी हिळ्ळी बंधाऱ्यात येण्यास आणखी चार दिवस लागण्याची शक्यता आहे.
16 एप्रिलला उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यामध्ये उजनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार 23 एप्रिलपासून भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. उजनीतून भीमेत पाणी सोडण्यात आल्याने सांगोला, पंढरपूर, मंगळवेढ्यासह भीमा नदी काठातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
भीमा नदीकाठील गावात पिण्यासाठी, जनावऱ्यांसाठी पाणी मिळत नसल्याने उजनीतून भीमा नदीत पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत होती. त्याची दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाणी सोडण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यानुसार भीमा नदीत पाणी सोडण्यात येत असून, आगामी कळात जिल्ह्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.