सोलापूर : शासन महिलांना लाडकी बहिण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये देत आहे. परंतु, उपेक्षित बहिणींसाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातून मात्र गेल्या दोन वर्षात दमडाही दिला गेला नाही. कारण या महामंडळाला गेल्या दोन वर्षात महिला सक्षमीकरणाचे कोणतेही उद्दीष्टच दिले नव्हते. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील एकाही लाभार्थ्याची निवड केली गेली नाही.
उपेक्षित मातंग व अन्य अनुसूचित जातीतील समाजाच्या विकासासाठी अण्णाभाऊ साठे हे महामंडळ काम करते. शिवाय विविध उद्योग व्यवसाय आणि प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्यही करते. महामंडळ महिला समृद्धी ही योजनाही राबवते. या योजनेतून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे याकरिता उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्यही करते. मात्र, गेल्या दोन वर्षापासून शहर जिल्ह्यातील या उपेक्षित समाजातील एकाही लाडक्या बहिणीला महिला समृद्धी योजनेतून अर्थ साहाय्य केले गेले नाही.
कारण, गेल्या दोन वर्षापासून महामंडळाच्या वरिष्ठ प्रशासनाकडून येथील शहर जिल्ह्यासाठी एकही उद्दिष्ट देण्यात आले नाही. म्हणून एकाही लाडक्या बहिणीला उद्योग व्यवसाय थाटून स्वकर्तृत्वावर उद्योजिका होता आले नसल्याचे चित्र आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या महामंडळाकडून महिलांसाठी अनेक योजना आहेत. परंतू महामंडळाने महिला समृद्धीचे उद्दिष्टच ठरवले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
एकीकडे महिलांसाठी योजना राबवत असल्याचा सरकार आव आणते. तर दुसरीकडे उपेक्षितांना देताना मात्र हात आखडता घेते. मग, सामान्य महिला ह्या स्वतःच्या पायावर कशा उभारतील?-तिप्पव्वा सोनकवडे, अक्कलकोट