सोलापूर : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्यावतीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नऊ आगारातून विविध गावाला जाणाऱ्या प्रमुख मार्गावर लालपरीच्या 65 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढलेल्या फेऱ्यामुळे ग्रामीण भागातील विविध गावांना ये-जा करणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ होईल. एसटीची वाट पाहत बसस्थानकावर बसणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने एसटीच्या ग्रामीण भागात सध्या होत असलेल्या नियमित फेऱ्यांशिवाय नवीन फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढलेल्या फेऱ्यांचा ग्रामीण भागातील महिलांसह अन्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. कारण, सध्या त्यांना अनेक गावच्या बसस्थानकावर लालपरीची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. हा त्रास त्यांच्यासाठी नेहमीचाच बनला होता. सध्या वातावरणातील उन्हाच्या झळा वाढत आहेत. वाढत्या उन्हाचा प्रवाशांना त्रास होऊ नये, म्हणून यावर उपाययोजना करत महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने तोडगा काढला आहे.
नऊ आगारातून विविध मार्गावर धावणाऱ्या बसेसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. वाढवलेल्या फेऱ्यामधील बसमधून प्रवास करणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग सवलत आदी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सर्व सवलतीच्या योजना लागू राहतील. वाढवलेल्या फेऱ्यामुळे एसटीच्या तिजोरीत भर पडणार आहे.