सोलापूर : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ मधील पेरणीला गती मिळत असून २० ते २७ जुलैअखेर सरासरी ४८.५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
महा कृषी ॲप पोर्टलवरील अहवालानुसार यंदा मका, तूर, उडीद आणि सोयाबीन या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील काही दिवस सातत्याने पाऊस झाल्यास उर्वरित क्षेत्रावरील पेरणीही वेगाने पूर्ण होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील ४७,८६१ हेक्टर मका क्षेत्रापैकी ३०,२६८ हेक्टर (६३ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तुरीची ८६,५८३ हेक्टरपैकी २८,९४० हेक्टर (३३ टक्के) तर उडीदाची ५८,१६६ हेक्टरपैकी २२,६८४ हेक्टर (३९ टक्के) क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. मुगाची १५ टक्के, बाजरीची १९ टक्के आणि ज्वारीची २७ टक्के पेरणी झाली आहे.
तेलबिया पिकांमध्ये सोयाबीनची पेरणी सर्वाधिक ८८ टक्के झाली असून ८१,२७० हेक्टरपैकी ७१,४८१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. कापूस ९३ टक्के, तर सूर्यफूल १० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.