सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ४ लाख २ हजार ५२३ हेक्टरवरील पिके ही पावसाअभावी माना टाकल्या असून, करपून जाण्याच्या स्थितीत आहेत. दरम्यान, या पिकांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी संबंधित उपविभागाच्या प्रांताधिकाऱ्यांची समिती स्थापन केली असू, या समितीकडून पिकांच्या स्थितीचा अहवाल शासनाकडे सादर करणार आहे.
जिल्ह्याचे सरासरी खरीप क्षेत्र ३ लाख ३७ हजार ९६८ हेक्टर असून, यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ४ लाख २ हजार ५२३ हेक्टरवर पेरणी झाली आहेत. या पिकांची स्थिती सोमवार, दि. ७ सप्टेेंबर ते शुक्रवार, दि.११ सप्टेंबरपर्यंत पाहणी केली जाणार आहे. त्यातून जे अहवाल प्राप्त होईल, ते अहवाल शासनाकडे पाठविले जाणार आहेत.
राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीच यक्ष तथा कृषी आयुक्तांनी जिल्हास्तरीय देखरेख समितीची बैठक घेऊन यातील खरीप पीक पाहणीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, तालुक्यातील पुरस्कारप्राप्त, प्रगतिशील शेतकरी किंवा महिला शेतकरी, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्र, मोहोळमधील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांचा समावेश असलेली समिती गठित केली आहे.
यंदा १८९ मिमी पाऊस
काही शेतकऱ्यांनी जूनमध्ये धूर पेरणी केली. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. उगवण झाली. परंतु नंतर पावसात खंड पडल्याने पिके फुलोऱ्या स्थितीत करपू लागली आहे. यंदाच्या पावसाळ्यात केवळ १८९ मिमी इतकाच पाऊस पडला आहे.
पावसाळ्याचे राहिले केवळ २४ दिवस
शासकीय आकडेवारीनुसार जून ते सप्टेंबर असा चार महिन्याचा कालावधी हा पावसाळा म्हणून गृहित धरला जातो. परंतु यंदा जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नाही. तर दुसरीकडे सप्टेंबर महिन्याचाही पहिला आठवडा कोरडा गेला आहे. आता पावसाळ्यातील केवळ २४ दिवस शिल्लक राहिले आहेत.