बार्शी : तालुक्यातील काटेगाव येथे आरोग्य उपकेंद्रातील निष्काळजीपणामुळेे व उपचार न मिळाल्याने एका निष्पाप नागरिकाचा नाहक बळी गेल्याचा प्रकार दैनिक पुढारीने उजेडात आणताच जिल्हा आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. एक वर्षापासून रिक्त असलेल्या जागा तातडीने भरून घेण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. दरम्यान नाहक तरुणाचा बळी गेल्या प्रकरणात दोषी कोण व कोणती कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काटेगाव येथील एकाचा उपचार न मिळाल्याने हृदयविकाराने मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मृत तरुणाला तातडीची वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्यांचा जीव वाचला असता. काटेगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह इतरांनीही रिक्त जागा भरण्यासाठी वारंवार लेखी व तोंडी प्रयत्न केले होते. लेखी ठराव घेतले होते. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नाहक एक जीव गेल्याची चर्चा सुरू होती. काटेगाव येथील आरोग्य उपकेंद्र हे केवळ नावालाच कार्यरत असून प्रत्यक्षात ते ‘असून अडचण नसून खोळंबा’ असे केंद्र बनल्याची तीव्र टीका नागरिकांकडून होत आहे.
डॉक्टरांच्या गैरहजेरीबाबत यापूर्वीही अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित प्रकाराची चौकशी करावी व जागा रिक्त ठेवणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी याकडे गांभीर्याने पाहणार का, आणखी एखादा जीव जाण्याची वाट पाहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.