सोलापूर : अनैतिक संबंधाचा शेवट हा किती भयानक असतो, याची प्रचिती सोलापूरकरांना शुक्रवारी (दि. 27) आली. अनैतिक संबंधाच्या कारणातून पती-पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली. त्यांनी विजयपूर येथील ए. के. नावाच्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सोमनाथ धानप्पा पाटील (वय 40) आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील (वय 35, दोघे मूळ रा. शिरपनहळ्ळी, ता. द. सोलापूर, सध्या रा. कलावती नगर, अक्कलकोट रोड एमआयडीसी, सोलापूर) हे दोघेही शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास कलावती नगर येथील राहत्या घरी तोंडाला फेस येऊन बेशुध्दावस्थेत आढळून आले. त्यांच्या शेजारी विषाची बाटली पडलेली होती. सोमनाथ यांचा भाऊ नागनाथ पाटील यांनी दोघांनाही सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वी पाटील दांम्पत्य मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
एमआयडीसी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून दोघांनीही आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे निदर्शनास आले. ती चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाटील यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांनी आत्महत्या का केली याबाबत उलट सुलट चर्चा नातेवाईकांमध्ये होत होती. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे. तर चिठ्ठीवरुन गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.
कलावती नगर येथे पती-पत्नीने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. विजयपूर येथील अभिषेक दत्तात्रय कोरे याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चिठ्ठी लिहली आहे. याबाबत आम्ही तपास करीत आहोत.- प्रमोद वाघमारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमआयडीसी पोलिस स्टेशन
दाम्पत्याला त्रास देणारा ‘ए. के.’ कोण..?
सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत विजयपूर येथील ए. के. याचे नाव लिहिले आहे. या ए. के. च्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. अभिषेक दत्तत्रय कोरे (रा. विजयपूर) असे त्याचे पूर्ण नाव असून, त्याचे आणि श्रीदेवी यांचे अनैतिक संबंध होते का? याचा तपास आता पोलिस करीत आहेत.