सोलापूर : शासनाच्या माझी वसुंधरा 4.0 अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी करत ‘भूमी’ या घटकात राज्यस्तरावर 3 लाख ते 10 लाख लोकसंख्या गटामध्ये एकमेव शहर म्हणून मानाचा दोन कोटी रुपयांचा विशेष पुरस्कार पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे पुणे विभागात सोलापूर महापालिका प्रथम क्रमांकावर ठरली आहे.
मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, महेश देवकर, मनोज देवकर, उद्यान अधिकारी स्वप्नील सोलंकर, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, गणेश बिराजदार उपस्थित होते.
भूमी या घटकांतर्गत सोलापूर महानगरपालिकेने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विविध व्यापक उपक्रम राबविले होते. वन विभाग, पर्यावरणप्रेमी संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच महाविद्यालयांच्या सहकार्याने शहरात मोठ्या प्रमाणावर देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली होती. शहरातील विविध भागांत रोपवाटिका उभारून हरित पट्टे विकसित करण्यात आले असून शहर हरित व सुंदर करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले आहेत. स्वच्छता व पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे शहराने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अभिमानाची बाब : महापौर
महापौर विनायक कोंड्याल यांनी या यशाचे श्रेय महापालिकेचे आयुक्त, अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच सोलापूरकर नागरिकांना दिले असून भविष्यातही पर्यावरण संवर्धनासाठी अधिक जोमाने कार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. या सर्वसमावेशक पर्यावरणीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेऊन हा बहुमानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून ही कामगिरी शहरासाठी अभिमानाची बाब आहे.