सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गीत दुथडी भरून वाहत असलेल्या व पाण्याचा प्रचंड वेग असलेल्या नदीपात्रात बुडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला तर अन्य दोघांना वाचवण्यात यश आले. ही घटना शनिवार दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
होनमुर्गी (ता. दक्षिण सोलापूर) येथील इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या तिघा मित्रांसह वर्गातील एक मुलगी शाळा सुटल्यानंतर शेळी घेऊन चारायला गेले होते. शेळ्यांना चारल्यानंतर ते शेळ्यांना घेऊन नीरा नदीपात्रात पाणी पाजण्यासाठी गेले. तेव्हा त्या तिघा मित्रांना दुपारच्या उन्हामुळे पोहोण्याचा मोह झाला. तिघेही पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले. मात्र नदीपात्रात पाणी खूप असल्याने तसेच पाण्यास वेग असल्याने तिघेही मित्र घाबरले. पाण्यात ते गटांगळ्या खाऊ लागले. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एकाने पाण्यात उतरून दोघांना वाचवले, मात्र समर्थ बनसिद्ध कोळी याचा बुडून मृत्यू झाला.
समर्थ हा आई-वडिलांना एकुलता एक होता. समर्थसह लकी परमेश्वर वाघमारे, रामा चंद्रकांत भोई, तेजस्विनी माळप्पा पुजारी असे चौघे पाचवीत शिकत होते. भर उन्हाळ्यात दुथडी भरून वाहत असलेले सीना नदीतील पाणी पाहून त्यांना पोहोण्याचा मोह झाला. म्हणून, तिघेही पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र नदीच्या पाण्यास मोठी गती असल्याने व पाणी अपेक्षेपेक्षा खूप असल्याचे लक्षात आल्यानंतर तिघेही पाण्यात गटांगळ्या खावू लागले. ते पाहून तेथेच असलेल्या तेजस्विनी माळप्पा पुजारीने आरडाओरडा केला. याचवेळी मोटार चालू करण्यासाठी प्रकाश सुरेश भोई हा गावातील तरुण नदीवर आला होता. ते पाहून त्याने नदीत उडी मारून रामा व लकी यांना पाण्यातून बाहेर काढले.
त्यानंतर समर्थला पाण्याबाहेर काढण्यासाठी प्रकाश गेला तोपर्यंत समर्थ साधारणतः दोनशे मीटरपेक्षा जास्त लांब वाहत गेला होता. तिथे एका मोटारीच्या पाईपच्या फुटबॉलला समर्थ अडकला होता. तिथपर्यंत प्रकाश पोहोत गेला. प्रकाशने समर्थलाही बाहेर काढले पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. समर्थच्या मृतदेहावर सायंकाळी सातच्या दरम्यान अंत्यसंत्कार करण्यात आले. येत्या 11 एप्रिलला समर्थ पाचवीची वार्षिक परीक्षा दोणार होता.