पोखरापूर : मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोरील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. पोलीस चौकी समोरच वाहतुकीची कोंडी होत असल्याने नेमके वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी करतात तरी काय? असा या निमित्ताने संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोरील उड्डाणपुलाखाली नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक शाखेची पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची ही नेमणूक करण्यात आली आहे. पंढरपूरकडून सोलापूरकडे जाणाऱ्या व पुण्याकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या गाड्या उत्तरेकडील उड्डाणपूला खालून ये जा करतात. त्याचबरोबर मोहोळ शहरातून बस स्थानकाकडे तसेच शहराला जोडणाऱ्या हद्दवाढ भागाकडे याच उड्डाणपुलाखालून वाहतूक होते. या उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी गर्दी केल्यामुळे वाहन चालकांना स्वतःचा जीव मुठीत घेऊन वाहन चालवण्याची वेळ आली आहे.
काही महिन्यांपूर्वी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्यामुळे याच उड्डाणपुलाखाली एसटी बसच्या खाली जाऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतरही या ठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेला सुरळीत करण्यात पोलिस प्रशासनाला यश आले नाही. दोन्ही उड्डाण पुलाखाली मोठ्या प्रमाणात दुचाकी व चार चाकी वाहनांची पार्किंग केली जाते, याकडेही वाहतूक शाखेचे कर्मचारी सोयीस्कर दुर्लक्ष करतात.
मोहोळ शहरात जवळपास तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये येतात. त्या विद्यार्थ्यांचा येण्या जाण्याचा रस्ता ही याच उड्डाणपूला खालून असल्याने एखादा मोठा अपघात झाल्यास त्याला कोण जबाबदार राहणार असा संतप्त सवाल वाहनधारक व नागरिकांमधून विचारला जात आहे.