सोलापूर

सोलापूर : स्वच्छ शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत कारुंडे प्राथमिक शाळा जिल्ह्यात प्रथम

निलेश पोतदार

नातेपुते (सोलापूर) ; पुढारी वृत्‍तसेवा 

कारूंडे (ता.माळशिरस) सोलापूर पासून दीडशे किलोमीटर अंतरावर या गावाची ओळख निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ शाळा, सुंदर शाळा अभियान संपूर्ण जिल्हाभर मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. यामध्ये अनेक विविध उपक्रम राबवित इयत्ता पहिली ते आठवीच्या गटांमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक येण्याचा मान जिल्हा परिषदेच्या कारूंडे प्राथमिक शाळेला मिळाला.

या स्पर्धेचा निकाल (८ फेब्रुवारी) यशवंतराव चव्हाण सभागृहात सोलापूर या ठिकाणी घोषित करण्यात आला. जिल्ह्यांमधून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पहिला क्रमांक आलेल्या शाळांचा सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत विधान भवन मंत्रालय मुंबई या ठिकाणी हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी सत्कार स्वीकारताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माऊली मसुगडे, शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ शिंदे, शरद रुपनवर, संतोष पवार आदी शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संपूर्ण अभियानाचे तोंड भरुन कौतुक केले. तसेच ही संकल्पना ज्यांच्या संकल्पनेतून राबविली गेली ते सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे कौतुक केले.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा नजिकच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने आकार घेतील असा विश्वास अजितदादांनी व्यक्त करत अशा चांगल्या शाळांना भेटी द्यायला, त्या शाळा पाहायला मला निश्चित आवडते. अशा शाळांना नजीकच्या दोन महिन्यांमध्ये भेटी देऊ असे आश्वासन अजितदादांनी दिले. जे कर्मचारी मनापासून काम करतात त्यांच्या कामाचं कौतुक करणं हे आम्हा पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे, अशा शब्दात केलेल्या कामाची पावती अजित पवार यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी कारुंडे शाळेचे नाव घेऊन कौतुक केले. अशी गावे असे अधिकारी असे पदाधिकारी एकत्र आल्यास ऐतिहासिक काम झाल्याशिवाय राहत नाही. ते कारुंडे येथील लोकसहभागातून लक्षात येते. नजिकच्या काळामध्ये कारुंडे शाळेला भेट देण्याचा मानस आहे असे त्‍यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी हे अभियान राबविण्या पाठीमागचा उद्देश संपूर्ण सभागृहाला याठिकाणी सांगितला. कोरोना काळामध्ये जी परिस्थिती जिल्हा परिषद शाळेची झालेली होती. त्यामधून शाळेला नवचैतन्य मिळावं या उद्देशाने हे अभियान राबवल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत वीस विविध उपक्रम राबविले असल्याचे दिलीप स्वामी यांनी सांगितले.
माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तमराव जानकर,सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किरण लोहार, माळशिरस तालुक्याचे गट विकास अधिकारी श्रीकांत खरात, तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप करडे, केंद्रप्रमुख दत्तात्रेय झेंडे तसेच तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शाळेतील मुख्याध्यापकाचे अभिनंदन केले.

SCROLL FOR NEXT