बार्शी : बदलती जीवनशैली आणि धावपळीच्या नोकरी-शिक्षणामुळे बार्शी शहरातील नागरिकांच्या आहारात फास्टफूडचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर, विशेषतः पचनसंस्थेवर होताना दिसत आहे. अलीकडील काळात रुग्णालयात पचनविकाराच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत असून दररोज १५० ते २०० रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही दररोज अनेक रुग्ण पोटाच्या विविध तक्रारी घेऊन येत आहेत.
पचनक्रिया बिघडल्यास आम्लपित्त, अॅसिडिटी, पोटदुखी, जुलाब, अल्सर, पचनसंस्थेचे संसर्गजन्य रोग आणि गंभीर प्रकरणांमध्ये पचनसंस्थेचा कर्करोगही होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. बार्शीतील या रुग्णालयात विविध कारणांमुळे पचनाच्या आजाराशी संबंधित दररोज सरासरी १५० ते २०० रुग्ण तपासणीसाठी येतात. गेल्या दोन-तीन वर्षांत ही संख्या वाढली आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार घेता यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. फास्टफूडमुळे पचनाचे विकार वाढले आहेत, त्यामुळे ते शक्यतो टाळायलाच हवे.”
डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार, केवळ फास्टफूडच नव्हे तर मानसिक ताणतणावही पचनविकारांना मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. बार्शीतील अनेक कुटुंबांमध्ये कामाचा ताण, अभ्यासाचा ताण आणि वेळेवर जेवण न होणे यामुळे लोक जास्त प्रमाणात बाहेरचे खाणे, पिझ्झा, बर्गर, चायनीज, वडापाव आणि तळले पदार्थ खात आहेत. त्यामुळे पित्त, गॅस, अपचन आणि पोटदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत.
पोटाच्या विकाराचे तज्ज्ञ सांगतात, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले तरी पचनसंस्था योग्य प्रकारे काम करत नाही. त्यामुळे पित्ताचा त्रास होतो. बार्शीसारख्या उष्ण हवामानात पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी शरीरात दररोज अडीच ते तीन लिटर पाणी जाणे आवश्यक आहे.”
निरोगी राहण्यासाठी जीवनशैली आणि पौष्टिक आहार दोन्ही महत्त्वाचे आहेत. डॉ. यांच्या मते, पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. त्याचवेळी फास्टफूड, जास्त तेलकट, तळले, गोड आणि अति मसालेदार पदार्थ टाळावेत. रोजच्या जेवणात जास्त मेदयुक्त पदार्थ नसावेत, कारण त्यामुळे पचनक्रिया मंदावते.
तज्ज्ञांच्या मते, व्यक्तीची पाचनक्षमता चांगली असेल तर हृदय, फुफ्फुसे आणि मेंदूचे आरोग्यही चांगले राहते. बार्शी शहरात फास्टफूडची मागणी वाढली आहे. त्यामुळे पचनविकारांचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. यासाठी कुटुंबातच घरगुती, पौष्टिक आहाराची सवय लावणे आणि पाणी, व्यायाम यावर भर देणे ही काळाची गरज बनली आहे.
ॲसिडिटींकडे अथवा इतर आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करावी. रोजच्या आहारात बदल करून घरचा आहार घ्यावा. आरोग्य महत्वाचे आहे. शरीर ठीक, तर सर्व ठीक” हेच निरोगी आयुष्याचे सूत्र आहे.- डॉ. संजय अंधारे , बार्शी