सोलापूर : राज्य शासनाच्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्यातील सिंचन, घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यामुळे आता नागरिकांसह शेतकऱ्यांना अधिकची रक्कम भरावी लागणार आहे. याबाबतचे नवे आदेश हे मागील १ जुलै २०२६ पासून लागू केले आहेत. आता शेतकऱ्यांना आणखी आर्थिक ताण सहन करावे लागणार आहे.
शासनाने नव्या दरांसाठी हरकती मागवून घेतल्या होत्या. या हरकती मे 2026 मध्ये मागविण्यात आली होती. त्यावेळी सुनावणी झाली. त्या पार्श्वभूमीवर शेती आणि घरगुती पाणी वापरासाठी पूर्वीच्या तुलनेत दरात मोठी वाढ केली आहे. याआधी प्राधिकरणाने ११ जानेवारी २०१८ रोजी पाणी वापराचे दर ठरविले होते. त्यानंतर जुलै २०२६ ते जून २०२९ या कालावधीसाठी नवे दर ठरविले आहेत.
आता मीटरच्या आधारे पाणी वापराची सक्ती
नव्या दरवाढीच्या आदेशात पाण्याचा बेसूमार होणारा वापर लक्ष्यात घेऊन मीटरच्या आधारे पाणी वापराची सक्ती करण्यात आली आहे. त्याआधारे बिले दिली जाणार आहेत. परंतु राज्यामध्ये सिंचनासाठी अजूनही मीटर पद्धती वापरली जात नाही. दरम्यान शेतीसाठी पाणीपट्टी हेक्टरी आकारली जाते. महापालिका, नगरपालिकांना नव्या दरानुसार बिल देण्यासाठी ते तयार करण्याचे काम जलसंपदा विभागाकडून सुरू आहे.