सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे 130 कोटी रुपयांचे ऊस बिल थकविले आहे. त्यामुळे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पाचव्या दिवशीही धाराशिवचे आमदार कैलास पाटील, उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांची बिले जमा करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, साखर आयुक्तांशी संपर्क साधून केली. मात्र, याप्रकरणी कोणता तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.
दक्षिण सोलापूर तहसीलदार किरण जमदाडे यांनी शेतकरी व कारखान्याचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेतली. शेतकऱ्यांची ऊस बिले देण्यासाठी साखर कारखान्याने वेळ मागितला आहे. नियमानुसार आरआरसीची कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांच्या रकमा देण्यासाठी सुमारे दोन महिन्याचा कालावधी लागणार असल्याची भूमिका तहसीलदार जमदाडे यांनी घेतली आहे.
यावेळी आंदोलक नेता ॲड. अमोल पाटील, सचिन सपकाळ, सुभाष बावकर, अंकुश जाधव, अमोल सुरवसे, चाँद मुजावर, अंबादास शिवशंकर, सचिन जवळगे, प्रशांत सुरवसे , शेतकरी बांधव उपस्थित होते.