करमाळा : उजनीकाठच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी अवघा दोन-तीन तास वीज पुरवठा होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. कमीत कमी आठ तास अखंड व नियमित वीजपुरवठा सुरू करावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
करमाळा तालुक्यातील उजनी लाभ क्षेत्रामध्ये जवळपास सर्वच गावांना सध्या वीज पुरवठा सुरळीत होत नाही. लोड शेडिंगच्या नावाखाली दोन ते चार तास तोही खंडित वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे मोटारी जाळण्याबरोबरच स्टार्टर जळणे, केबल जळणे असे प्रकार वारंवार होत असून पिकांना पाणी देता येत नाही.
उभी पिके जळून चालली असून शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. धरणग्रस्त शेतकऱ्यांवरच लोडशेडिंगचा नियम लादून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांना मोठ्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
उजनी जलाशयातूनच पिकांना पाणी देण्याशिवाय दुसरा पर्याय आता उपलब्ध राहिलेला नाही. उजनी शंभर टक्के भरले असूनही केवळ अनियमित व अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर जनावरांचेही हाल होत आहे. आठ दिवसांमध्ये वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास १८ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.