करमाळा : महावितरणच्या तुटलेल्या तारेला स्पर्श होऊन करमाळा तालुक्यातील गुळसडी येथील विजय वसंत क्षीरसागर (वय ६० ) या शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला आहे.
विजय क्षीरसागर हे गावातील हनुमंत उद्धव पाटील यांच्या गुळसडी ते पांडे रस्त्यावरील उसाच्या शेतात गुरुवारी (१३ ऑगस्ट) फवारणी करत होते. यावेळी दुपारी शेतात तुटून पडलेल्या महावितरणच्या उघड्या तारेचा त्यांच्या पायांना स्पर्श झाला आणि विजेच्या जबर धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर गुळसडी येथील युवकांनी तातडीने महावितरण व करमाळा पोलीस स्टेशनला माहिती दिली.
करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तब्बल आठ ते दहा दिवसापासून तुटलेल्या तारेची माहिती महावितरणला देऊनही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी याबाबत दखल घेतली नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. याचा योग्य तपास करून क्षीरसागर यांच्या कुटुंबीयांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.