दक्षिण सोलापूर : होटगी-मद्रे हा प्रमुख जिल्हा मार्ग रेल्वे प्रशासनाने पत्रा मारून बंद केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. होटगी मद्रे रस्त्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून दोन कोटी 28 लाख रुपयांच्या निधीतून दोन महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम झाले होते.
शेतकरी बांधव रेल्वे ट्रॅकच्या पुलाखालून ये-जा करीत होते. मात्र रेल्वे प्रशासनाने दोन्ही बाजूला पुलासमोर लोखंडी पत्रे मारल्यामुळे हा रस्ता बंद झाला आहे. या रस्त्यासंबंधी तहसीलदार किरण जमदाडे यांनी स्थळ पाहणी करून रेल्वे विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांची बैठक लावणार असल्याचे सांगितले होते. आमदार सुभाष देशमुख यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी लोखंडी पत्रे मारत असताना शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला होता, तेव्हा पुलाखालून येण्यासाठी जाण्यासाठी जागा सोडण्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्याभरात या ठिकाणी पुन्हा रेल्वे प्रशासनाने पत्रा मारून पुला खालचा रस्ताही बंद केला आहे.
यापूर्वी अनेकदा शेतकरी रेल्वे ट्रॅक ओलांडून शेताकडे जात असताना शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला होता. या ठिकाणी सेंट्रल रेल्वे अप आणि डाऊन अशा दोन ट्रॅक आहेत. या ट्रॅक खाली अंडरपास रस्ता करून शेतकऱ्याचा मार्ग सुकर करावा, अन्यथा रेल्वे प्रशासनाच्या अडमुठे धोरणाला आंदोलनाद्वारे प्रत्युत्तर द्यावे लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. रेल्वे प्रशासन हा रस्ता अडवीत असेल तर राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा पैसा पाण्यात गेल्यासारखा आहे.