सोलापूर ःमुलींचे चांगले व्हावे या उद्देशाने वडिलांनी एकाच घरात दोन्ही मुलींचे लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिले. सख्ख्या बहिणी, सख्ख्या जावा असलेल्या या दोघींचाही लग्नानंतर अवघ्या पंधराच दिवसात हुंड्यासाठी सासरी छळ सुरू झाला. मुलींच्या सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्ने पाहणाऱ्या वडिलांनी अखेर पोलिसांकडे धाव घेत गुन्हा दाखल केला. याप्रकरणात सासरच्या सात जणांवर हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.
सोलापुरातील देगाव रोडवरील बल्लारी चाळ येथे राहणारे कुमार केंचप्पा वरेलुर (वय 57) यांना प्रेमा आणि जमुना या दोन मुली. जवळच्या नातेवाईकांच्या मध्यस्थीने त्यांनी मिरज येथील चिंतामणी कुटुंबातील अजय आणि विजय या दोन तरुणांशी त्यांचा विवाह ठरविला. दरम्यान, मुलांचे वडील वारले आहेत. दोन्हीही मुले प्रत्येकी 50 हजार पगारावर कंपनीत कामाला असल्याची खोटी माहिती चिंतामणी कुटुंबीयांनी दिली. त्यामुळे आपल्या दोन्ही मुलींचे चांगले होईल, एकाच घरात दिल्याने दोघी एकमेकींच्या आधाराने सुखी संसार करतील, असा विचार मुलींचे वडील कुमार वरेलुर यांनी केला. तसेच 10 फेब्रुवारी 2026 रोजी आठ लाख रुपये खर्च करुन एकाच मांडवात दोन्ही मुलींचे लग्न लावून दिले. दोन्ही मुलींना संसारोपयोगी साहित्य, बेड, कपाट, दोन्ही नवरदेवांना महागडी घड्याळे, चांदीच्या अंगठ्या आदी साहित्य दिले.
आपल्या दोन्ही मुलींचा सासरी छळ होत असल्याची माहिती मिळताच कुमार वरेलुर यांनी पोलिसात धाव घेतली. त्यावरून दोन्हीकडील नातेवाईक बसवराज नवले, प्रेमा नवले, मुलांचे मामा वीरस्वामी तुपदळे, मुलांची आई गुणवंता चिंतामणी, वडील आकाश चिंतामणी, मुले विजय चिंतामणी, अजय चिंतामणी यांच्यासह लग्न ठरवणाऱ्या मुलीकडच्या नातेवाईकांच्या विरोधात सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव करीत आहेत.