मोहोळ : मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथे शेतातील पत्राशेडमध्ये सुरू असलेल्या रम्मी जुगार अड्ड्यावर मोहोळ पोलिसांनी धाड टाकून १४ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८७७ च्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोख रक्कम, पत्त्यांचे संच आणि दोन दुचाकींसह ₹१ लाख ४५ हजार १०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.१० वाजण्याच्या सुमारास मौजे सिकंदर टाकळी (ता. मोहोळ) येथील दिनेश चव्हाण यांच्या शेतातील पत्राशेडमध्ये काहीजण रम्मी नावाचा पत्त्यांचा जुगार पैसे लावून खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत १४ जणांना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान ₹१५,१०० रोख रक्कम, १०४ पत्ते (५२ पानांचे दोन संच), बजाज सीटी-११० आणि होंडा शाईन अशा दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹१,४५,१०० इतकी आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई संदीप विलास सावंत यांच्या फिर्यादीवरून १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ. १५७९ पाटील करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप आणि मोहोळ पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली. मोहोळ पोलिसांच्या या कारवाईमुळे तालुक्यातील बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर पुन्हा एकदा धाक निर्माण झाला असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.