सोलापूर : जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांपैकी माळशिरस तालुका वगळता उर्वरित दहा पंचायत समित्यांमध्ये भाजपच्या सभापतींची निवड झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पंचायत समितीवर भाजपचे स्पष्ट वर्चस्व निर्माण झाले आहे.
यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे. 11 पैकी 10 पंचायत समित्यांमध्ये भाजपच्या हाती सत्ता गेल्याने जिल्हा भाजपमय झाला आहे. माळशिरस तालुक्यांमध्ये शिंदे शिवसेना पक्षांचे दत्तात्रय मगर यांची सभापतिपदी लॉटरी लागली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता आली असून, भाजपचा अध्यक्ष होणार आहे. त्याआधीच जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांमध्येही भाजपने आपल्या पक्षाचा सभापती करून जिल्ह्यातील पंचायत समित्यांवर वर्चस्व निर्माण केले आहे.
पालकमंत्र्यांना मिळाले मोठे यश
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नगरपालिका, महापालिके नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळविले. त्यानंतर जिल्ह्यातील अकरा पंचायत समितींपैकी दहा पंचायत समित्यांवर भाजपच्या सभापतींची निवड केली. त्यामुळे पालकमंत्री गोरे यांनी जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण केल्याचे दिसत आहे.
तालुकानिहाय सभापती नावे
अक्कलकोट - रश्मी हिप्परगी (भाजप), दक्षिण सोलापूर - संदीप टेळे (भाजप), उत्तर सोलापूर - तेजस्विनी बोराडे (भाजप), मोहोळ - असलम चौधरी (भाजप), बार्शी - मीनाक्षी रोंगे (भाजप), करमाळा - पूजा ढेरे (भाजप), माढा - पंडित देशमुख (भाजप), मंगळवेढा - दीपाली ताड(भाजप), सांगोला - पूनम इंगवले (भाजप), पंढरपूर - शुभम आगावणे (भाजप), माळशिरस दत्तात्रय मगर (शिंदे शिवसेना), यांची सभापती म्हणून निवड झाली आहे.