Solapur Barshi Teacher Family End of Life
वैराग: शेअर बाजारातील तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांच्या अवाढव्य आर्थिक नुकसानीमुळे आलेल्या नैराश्यातून एका शिक्षकाने आपल्या कुटुंबासह जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील हत्तीज येथे घडली आहे. शिक्षकाने पत्नी आणि दोन निष्पाप मुलांना प्रथम विषारी औषध दिले आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपविले. या घटनेमुळे बार्शी तालुक्यात खळबळ उडाली असून हत्तीज गावावर शोककळा पसरली आहे.
योगेश बाळासाहेब पाटील (वय ४१, व्यवसाय- शिक्षक), माधुरी योगेश पाटील (वय ३७, पत्नी), अथर्व योगेश पाटील (वय ११, मुलगा) आणि शिवांश योगेश पाटील (वय ९, मुलगा) अशी मृत पावलेल्या दुर्दैवी कुटुंबीयांची नावे आहेत. योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चौगांव बु. येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. सध्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने ते आपल्या कुटुंबासह मूळ गावी हत्तीज येथे आले होत
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास योगेश यांनी राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आधी आपल्या पत्नीला आणि दोन्ही मुलांना जेवणातून किंवा अन्य माध्यमातून विषारी औषध देऊन जीवे मारले. त्यानंतर घरातच गळफास लावून स्वतःचीही जीवनयात्रा संपवली.
शुक्रवारी (दि.१२) सकाळी नेहमीप्रमाणे दूध देण्यासाठी आलेली व्यक्ती पाटील यांच्या घरी गेली. मात्र, दरवाजा आतून बंद असल्याने आणि बराच वेळ हाका मारूनही आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्या व्यक्तीला संशय आला. त्यांनी लागलीच शेजाऱ्यांना गोळा केले. नागरिकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, योगेश पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्यांची पत्नी व दोन मुले अंथरुणावर मृत अवस्थेत आढळून आले. हा थरारक प्रकार पाहून गावकऱ्यांनी तात्काळ वैराग पोलिसांशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे आणि उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. यावेळी पोलिसांना घटनास्थळावरून योगेश पाटील यांनी लिहून ठेवलेली तब्बल २२ पानांची सविस्तर 'सुसाईड नोट आढळून आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, योगेश पाटील हे गेल्या काही काळापासून मोठ्या आर्थिक विवंचनेत होते. त्यांना शेअर बाजारात (Share Market) सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांचा मोठा फटका बसला होता. हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि लोकांचे पैसे देण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या आईकडून आणि नातेवाईकांकडून सुमारे १ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, तरीही आर्थिक कोंडी सुटत नसल्याने आणि कर्जदारांचा दबाव वाढल्याने त्यांनी हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या प्रकरणाचा पुढील अधिक तपास वैराग पोलीस करत असून सखोल कारणांचा शोध घेत आहेत. एकाच सुशिक्षित कुटुंबातील चार जणांचा असा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.