सोलापूर : राज्य शासनाने पीक पाहणीत अचूकता यावी, शेतकऱ्यांची कटकट संपावी, यासाठी खरीप व रब्बी हंगामातील पीक पाहणी करण्यासाठी आता सहाय्यकांची नियुक्ती केली असून, या सहाय्यकाद्वारेच ही पीक पाहणी होणार आहे.
याआधी शेतकऱ्यांकडूनच ऑनलाईनद्वारे पीक पाहणी नोंदली जात होती. परंतु शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत होते. ई-पीक पाहणीची जागा आता सेंट्रल डिजिटल क्रॉप सर्वेने घेतली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची अचूक नोंद होण्यासाठी शासनाला ई-पीक पाहणी शेतकऱ्यांनी स्वतःहून अथवा गावातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून होणे अपेक्षित होते. ई-पीक नोंद करण्याचे आवाहन केल्यानंतर प्रशासनाकडून पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांकडून तितका प्रतिसाद मिळत नव्हता. याशिवाय शेतात प्रत्यक्षात असलेले पीक व केलेल्या नोंदीत फरक आढळून आला. त्यामुळे शासनाने पीक पाहणीची जबाबदारी बदलली आहे.
या पिकांची सर्वे करुन त्याची माहिती भरण्यासाठी कोतवाल, ग्रामरोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानासह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पाहणीतून शेतातील पिके, जिरायत, बागायत, विहिरी, बोअर आदींची नोंद होणार आहे. केलेल्या पिकांची नव्या सर्व्हरवर नोंद केल्यानंतरच दुष्काळ, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्यास त्याची मदत दिली जाणार आहे.