सोलापूर : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या जिल्ह्यातील ३९ बालकांवर ११ ऑगस्टला मुंबई येथील बालाजी हॉस्पिटल येथे मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या चिमुकल्यांना नवजीवन मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने बालकांच्या आरोग्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमांमुळे या बालकांना नवजीवनदान मिळण्यास मदत होणार आहे. एकही बालक आरोग्य तपासणी व आवश्यक उपचारांपासून वंचित राहू नये, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले आहे. त्यामुळे आरोग्य व शिक्षण विभागाकडून समन्वय साधून बालकांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांवर तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याचे काम आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
तपासणीसाठी ५२ आरोग्य पथके
जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ५२ आरोग्य पथके कार्यरत आहे. अंगणवाडीतील शून्य ते सहा वर्षे आणि शाळांमधील सात ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
‘या’ आजारांची होतेय तपासणी
तपासणीदरम्यान जन्मजात व्यंग, हृदयविकार, पोषणातील कमतरता, शारीरिक व मानसिक विकासातील विलंब तसेच इतर गंभीर आजारांचे तपासणी करण्यात येत आहे. या आजारातील लक्षणे बालकांमध्ये आढळल्यास संबंधित बालकांना उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल केले जात आहे.
जून-जुलै २०२६ अखेर अंगणवाडीतील एक लाख ९९ हजार ६४४ बालकांची तर शाळांमधील ७२ हजार ७७ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. याच तपासणीत हृदयशस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या ३९ बालकांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.- कुशल जैन, सीईओ, जि.प. सोलापूर