सोलापूर : शहर व परिसरातील बेशिस्त आणि बेकायदा रिक्षाचालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. वाहतुकीचे नियम तोडून रिक्षा चालवणे, विनापरवाना प्रवासी वाहतूक करणे व तसेच वैध कागदपत्रांशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या 33 रिक्षा जप्त करण्यात आल्या तर 57 रिक्षांवर कारवाई करून दोन लाख 40 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरात बेकायदा प्रवासी वाहतुक करणाऱ्या रिक्षांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वायुवेग पथक व एसटी पथकाच्या मदतीने कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार रस्ते सुरक्षा व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने प्रवाशांच्या सुरक्षिततेचे भंग केलेल्या रिक्षा व वाहनांवरही दंडात्मक कारवाईसह 33 रिक्षांवर जप्तीची कारवाई केली आहे.
ही मोहीम यापुढील काळातसुद्धा चालू राहणार असून रिक्षाचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन न करता नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शहर आणि परिसरातील रिक्षाचालक व वाहनधारकांनी आपले वाहन परवाना, विमा, वाहन तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र व अन्य आवश्यक कागदपत्रे वैध करून घ्यावेत व वैध कागदपत्रे आपल्या सोबत ठेवावीत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. वायुवेग पथकाने केलेल्या कारवाईत दोन लाख 40 हजार रूपये दंड वसूल केला आहे.- विजय पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी